हल्ली नेहमी असच होतं.....
आत खूप काही दडलेलं असतं,पण लिहायला जावं तर शब्दच सुचत नाहीत! या शब्दांना पण ना..छंदच जडलाय...एकसारखा मनाशी लपवाछपवीचा खेळ खेळत असतात! मन तर तसंही आधीच गोँधळलेलं...ते आणखी गोंधळतं...बावरतं..! खूप काही साचलंय आत,पण शब्दांचे ओघळ वाहतच नाहीत..! कधी रिमझिमणारा पाऊस पाहिला ना,की हळूच मनाच्याही नकळत या शब्दांची रिमझिम सुरू होते...पटकन काहीतरी सुचतं..पण श्रावणाची सर जशी पटकन थांबावी तसा शब्दांचा प्रवाह थांबतो...मनातल्या भावनांचा साठा काही केल्या बाहेर पडत नाही! जीव कासावीस होत राहतो नुसता! बहुदा शब्दच माझ्यावर रुसले असावेत..पण नेमकं का? आजवर दिवसभराच्या धावपळीतून नेहमी त्यांच्यासाठी वेळ काढत आलीये मी. कधीकधी तर फक्त त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते होते. आजवर गहिवरलेल्या मनाला त्यांनीच दिलासा दिलाय..मग आज हा अजब खेळ कशासाठी?
असो..! काही प्रश्नांना उत्तरं नसतातच..! आणि शब्दांचं म्हणाल तर त्यांना रुसवा सोडावाच लागेल...शेतकर्याचा अंत बघणारा पाऊस कधीतरी त्याच्या मनासारखा कोसळतोच ना? तसंच आहे यांचंही...
अदिती जोशी