Wednesday, 27 July 2011

विरह

भिजलेली पाउलवाट
अन् भिजलेला किनारा
भिजवीती आज नयनांना
विरहाच्या अश्रूधारा..

मन तुझ्यात रे घुटमळते
सतविती तुझे ते भास
तू कधीतरी येशील रे
लागली जिवाला आस

स्मरती त्या लाघव भेटी
तो तुझा स्पर्श अलवार
स्मरती त्या शपथा स्वप्ने
प्रेमाची अमृतधार..!

रे आज तरी तू यावे
अन् माझे नयन पुसावे
तव मिठीत घेऊन मजला
प्रेमाच्या गावा न्यावे

निःशब्द भावना माझ्या
तुजला सार्या उमगाव्या
विरहाचे अभ्र गळावे
अन् प्रेमसुधा बरसाव्या...

अदिती जोशी

हुरहुर

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

मेघ आकाशी दाटले काळेभोर
सौख्य देहा या स्पर्शते मऊशार
गीत तरी का उदासीन वेड्या ओठी??

कशासाठी या उरात घालमेल?
तृप्त तरी का थरथरे सांजवेल?
ओल्या पाण्यात नयने ओथंबती...

आता काळोख दाटला भोवताली
सांज हळूच मिटली,रात झाली!
ओल्या सरी मनामध्ये येत-जाती

कुणा शोधे तमामध्ये वेडे मन?
हुरहुर अंतराला लावी कोण?
वारा छेडी सांजधून कशासाठी??

वेड लावी या मनाला सांजवेळ
कशासाठी जीवघेणा खेळे खेळ?
दाही दिशा अवचित अंधारती...

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

अदिती जोशी