Wednesday, 27 July 2011

हुरहुर

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

मेघ आकाशी दाटले काळेभोर
सौख्य देहा या स्पर्शते मऊशार
गीत तरी का उदासीन वेड्या ओठी??

कशासाठी या उरात घालमेल?
तृप्त तरी का थरथरे सांजवेल?
ओल्या पाण्यात नयने ओथंबती...

आता काळोख दाटला भोवताली
सांज हळूच मिटली,रात झाली!
ओल्या सरी मनामध्ये येत-जाती

कुणा शोधे तमामध्ये वेडे मन?
हुरहुर अंतराला लावी कोण?
वारा छेडी सांजधून कशासाठी??

वेड लावी या मनाला सांजवेळ
कशासाठी जीवघेणा खेळे खेळ?
दाही दिशा अवचित अंधारती...

मन एकाकी अबोल सांजराती...
हुरहुर ही अवेळी कुणासाठी?

अदिती जोशी

1 comment: